शंभुराजांना महाराजांचा खलिता – एके रात्री एका गुप्तहेराची पावले शंभूराजांच्या गोटाबाहेर वाजली. रायगडाहून नानाविधी सोंगे घेत तो हेर लाखमोलाचे पत्र घेऊन शंभूराजांच्या भेटीला आला होता. शंभूराजांनी तो थरथरत्या हाताने तो लखोटा समोर धरला. त्यावरची मुद्रा डोळेभरून पहिली.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता
शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
शंभूराजांनी आपले आसवांनी डबडबलेले डोळे पुसले व आपल्या भावनेच्या पुराला काबूत आणत ते पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करू लागले.
क्षत्रिय कुलावंतस राजा शिवाजी प्रति युवराज शंभूराजे दंडवत उपरी जैसा वाळल्या वृक्षात भ्रमर घुसावा, तैसे तुमच्या चिंतेने आमचा मेंदू पोखरला आहे.

जेव्हा शृंगारपूरच्या केशवपंडितांकडून आपण रामायणाचा मतलब जाणून घेत होता, तेव्हा तुम्हाला काय काय जाणवले? दशरथासारख्या आपल्या पित्याला दिलेलं वाचन पाळण्यासाठी भरल्या राज्यावर लाथ मारून प्रभू रामचंद्र निघुनी गेले. वनवासी झाले. आणि आज इकडे करोड होनांचे आमचे भरले स्वराज्य आपण लाथाडलेत आम्हांला पारखे होऊन गनिमाच्या मुलखात जायची आगळीक केलीत. फायद्या-तोट्याचा कोणताही विचार न करता आपण रागभरे वैऱ्याच्या मुलखी गेलात.
तुमचा हा विचित्र दुर्दैवी वियोग आमचं अंग जाळतोच आहे. त्यातच अलीकडच्या भूपाळगडावरच्या अत्याचाराची कहाणी ऐकली. मात्र त्या घटकेपासून आमच्या डोळ्यातून अश्रू नव्हे तर रक्त वाहते आहे. इथल्या सरंजामदाराचे हात जेव्हा परक्याच्या सेवाचाकरीचे शेण उचलण्यामध्ये आपल्या जन्माचे सार्थक मनात होते, तेव्हा रानोमाळातल्या कोना तानाजीचा, कोना मुरारबाजींचा असे अठरापगड जातीच्या कष्टकऱ्यांचे हात एकत्र आणून आम्ही स्वराज्य मंदिर उभारीले . तेच हात गनिमांकडून संभाजीराजांच्या देखत दिवसाढवळ्या छाटिले जातात, या दुर्भाग्याला काय म्हणावे? असो. आपल्याही हृदयाचे दुःख आम्ही जाणतो. का कोणास ठाऊक, तुमचा द्वेष आणि मत्सर करणारे डोळे आमच्या राज्यात कमी नाहीत.
मात्र आम्ही फक्त त्यांच्याच ओंजळीने उदक पितो ऐसे जर आपले मत असेल तर ते साफ झूट आहे. आपला द्वेष बाळगणाऱ्या मंडळीबरोबरच तुमच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकणारेही बरेच आमच्या स्वराज्यात आणि लष्करात अधिक आहेत! ह्या गोष्टीकडे एक सिंहासनाधिश्वर राजा आणि एक मायाळू बाप म्हणूनही आम्ही दुर्लक्ष कसे करू? झाल्या गोष्टी पुरे झाल्या, आता रुसवे फुगवे नकोत. त्या नरकातून लवकर बाहेर पद. जसा कृष्णसखा रुसून गेल्यावर गोकुळींचे मुलेमाणसे, रानपाखरे, गाईवासरे वेडीपिशी बनली होती, तैशीच अवस्था इथे तुम्हावर मायलोभ ठेवणाऱ्यांची झाली आहे. ह्या शिवाजीराजांसह अवघा महाराष्ट्र, इथले साधूसंन्यासी अन देवदेवताही आपल्या वाटेकडे नजर लावून आहेत. या, युवराज आपण लवकर स्वराज्यात माघारी या. पुढचे संकटाचे सारे गोवर्धन उचला.
ता.क.मगरीचा जबडा फाडून बाहेर निघणे तुम्हांस कष्टाचे जाईल, याची आम्हांस कल्पना आहेच. पण फिकीर नको. आम्ही दक्ष आहोतच. विजापूरकरांशीही आता आपले चांगले मैत्र जुळले आहे. वेळप्रसंगी तेही आपल्या मदतीस धाव घेतील. शंभूबाळ, यापरी चिंता नसावी. अंतर पडो न देणे. जाणिजे, लेखनालंकार .”
शिवाजीराजांच्या त्या भावस्पर्शी शब्दांनी शंभूराजांच्या काळजाचा ठाव घेतला. नुकतीच धुळाक्षरे शिकलेले पोर आपले लेखन मायपित्याला आनंदाने दाखवत सुटते, तसाच शिवाजी महाराजांचा तो खलिता युवराज दुर्गाबाईंना आणि राणूबाईंना दाखवत होते. आनंदाने वेडे झाल्यासारखे करत होते. भूपालगडावर घडलेल्या अत्याचाराच्या वेदनांनी त्यांचे मन पाखंडात होते. मात्र आबासाहेबांच्या या पत्रामुळे दिलाला कितीतरी दिलासा मिळाला. आता एकाच विचाराचे चक्र त्यांच्या मस्तकात गरगरत होते; कसे बाहेर पडावे दिलेरखानाच्या या चक्रव्यूहातून?