जिवाशिवाची पुनर्भेट – काल रात्री उशिराच शिवाजीराजांची पालखी पन्हाळगडावर येऊन पोचली होती. तेव्हा महादरवाज्यात तोफा कडाडल्या. राजांचे जंगी स्वागत झाले. त्या गर्दीमध्ये समोरच्याच बाजूला शंभूराजे उभे होते. शिवाजीराजांनी त्यांना आपल्या मिठीत घेतले. त्यांच्या पाठीवरून मायेने फिरणारा राजांचा हात थरथरला. ऊर भरून आला खरे तर खूप खूप बोलायचे होते. मध्ये अनेक कडूगोड घटनांचे दृष्टचक्र येऊन गेले होते. मने मोकळी होणे आवश्यक होती. मात्र दूरच्या प्रवासाने थोरले महाराज खूप शिणले होते. शिवाय साऱ्याच गोष्टी गर्दीसमोर मोकळेपणाने बोलणे शक्य नव्हते. त्यामुळेच दुसऱ्या दिवशी सकाळी भेटायचे ठरले.
शंभूराजे पन्हाळगडावर
शंभुराजांना पन्हाळावर येऊन एक महिना पार पडला होता. परंतु ते फारसे जात नसत. त्यांच्यासारखा बाणेदार युवराज मोगलांना जाऊन मिळावा, या कल्पनेने सामान्य रयतेची मने खूप दुखावली होती. ते कधी सहज घोडा घेऊन रपेटीसाठी बाहेर पडले तरी लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत राहायचे. त्यामुळे महालात बसून राहणेच युवराजांना बरे वाटायचे. अनेक दिवस ते तळमळत होते. एक वेळ बत्ती दिलेल्या अजस्त्र पेटत्या तोफेला सामोरे जाणे कमी धोक्याचे वाटले असते, परंतु स्वराज्यद्रोहासारखा भयंकर गुन्हा करून आपल्या पित्यापुढे कोणत्या तोंडाने जायचं?…मात्र काल रात्रीची शिवरायांची ती अल्हाददायक मिठी शंभुराजांना खूप आश्वासक वाटली होती.
प्रातःकाळीच थोरल्या महाराजांचा निरोप आला. त्यांनी शंभुराजांना सकाळी सकाळीच गडावरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये बोलावले होते. त्यांच्या आगमनाच्या निमित्ताने महापूजेचा संकल्प सोडला होता. पूजाकर्म आटोपायला बराच वेळ झाला. शेवटी ते दोघे पितापुत्र दुपारीच एकांतामध्ये भेटू शकले. खाजगीकडील त्या महालात अन्य कोणी नव्हते. मध्ये बऱ्याच वादळवाटा उठल्या होत्या. विरूनही गेल्या होत्या. दोघेही पितापुत्र एकमेकांच्या प्रसन्न मुद्रांकडे अप्रुपाने पाहत होते.
थोरले महाराज हसत बोलले, “शंभूराजे, जरी आपण मोगलांना सोडलं तरी स्वराज्यात परताल कि नाही या शंकेने आम्हाला बैचेन करून सोडलं होतं. वाटलं इथं परतण्यास कचराल किंवा लाजाल. कदाचित दुसरीकडे निघून जाल.”
शंभूराजांनी आवंढळा गिळला. त्यांच्या डोळ्यांच्या दाठ पापण्या लावलवल्या. ते काहीसे कष्टी होऊन बोलले, “आबासाहेब, खूप दुनिया देखली. अंधाराची वाट चालताना ठेचकाळलो, पण पुन्हा स्वतःच्याच हाताने आपलं फाटक काळीज सांधवल! म्हंटल, पुन्हा सूर्यदेवाकडेच चालत जायचं, तर घाबरायचं कश्याला?”
“शंभू!शंभू!सांगतो काय, प्रथम आपण कवी आहात आणि नंतर युवराज!” शिवाजीराजे कळवळ्याने बोलले. संभाजीराजांना शिवराय आपल्या डोळ्यांत साठवण्याचा प्रयत्न करत होते. अचानक त्यांच्या डोळ्यातून गालावर मोती ओघळले. आवंढा गिळत ते दुःखी सुरत बोलले, ” तर शंभूराजे, आपण एकट्यानेच माघारी आलात?”
“माफ करा आबासाहेब,” शिवरायांच्या विचारणीने शंभूराजांच्या काळजाचा टवका उडाला होता. दोघेही पितापुत्र कमालीचे दुःखी झाले. शंभूराजे बोलले, ” आबासाहेब, आमच्यासोबत निघा असा दुर्गाला आणि राणूआक्कांना आम्ही खूप आग्रह केला होता. जीव तोडून मिनत्या केल्या. पण त्यांनी ऐकलं नाही.”
“नाही!नाही, शंभूबाळ. त्या पोरीचंच खरं. त्यांना माघारी आणण्याच्या फंदात आपण स्वतः तिथे कायमचे अडकून पडला असता. असो! शंभूबाळ, आज ना उद्या आई भवानी तुमच्या हातानं बळ देईन. तेव्हा मात्र आपल्या बळकट हातांनी दोघीनाही सोडवून आणा म्हणजे झालं.” आपल्या होनहार पुत्राकडे नजर टाकत शिवराय बोलले, “शंभूराजे, तुम्हांस कर्नाटकाच्या मोहिमेस न नेऊन आम्ही तुमच्यावर घोर अन्या केला, अशीच आपली भावना असेल, होय ना!”
शंभूराजे अडखळले. पण न राहून बोलले, “का असू नये आबासाहेब? आमचे अवघं नऊ वर्षाचं वय असताना आपण आम्हाला दूर लोटलत . पुरंदरच्या करारानुसार मिर्झा राजा जयसिगांकडे ओलीस ठेवलात. दहाव्या वर्षी औरंग्याच्या आग्रा दरबारात हिंदवी स्वराज्याचा प्रतिनिधी म्हणून आम्ही हजेरी लावत होतो. पुन्हा एकदा एकराच्या बाराव्या वर्षी मोगलांचा मनसबदार म्हणून आपण आम्हाला शाहजादा मुअज्जमकडे धाडलंत.”
“साऱ्या गोष्टी स्मरणात आहेत शंभूराजे आमच्या.” शिवराय बोलले.
“अजून थोडी आठवण करून देतो. आबासाहेब, आम्ही मुअज्जमकडे असताना आमच्यावर आपण कोणती जोखीम सोपवली होती?” शिवाजीराजांनी प्रश्नार्थक नजरेने शंभूराजांकडे पहिले. युवराज पुढे सांगू लागले, ” औरंगजेबाच्या शाहजाद्याला, त्या हुशार मुअज्जमला आम्ही फोडावा. त्याच्या बापाविरुद्ध त्याला भागवत करण्यासाठी भाग पाडाव, हि कामगिरी तेव्हा आपण मला सांगितली होती.” त्या आठवणीने शिवराय खुदकन हसले. शिवाजीराजांच्या त्या आनंददायी मनस्थितीतच शंभूराजांनी पुढचा खडा टाकला,
“का आबासाहेब?प्रयत्न करूनही नाही का यश येईना त्या कामगिरीत, पण अवघ्या अकराव्या बाराव्या वर्षात ज्या युवराजांवर औरंगजेबाच्या शाहजाद्याला फोडायची आपण जोखीम सोपवली होतीत, तोच तुमचा पुत्र वयाच्या विशीमध्ये आपल्या पित्याचं बोटं धरून मोहिमेवर येण्यात नालायक कसा ठरला हो?”
शिवरायांची मुद्रा कष्टी झाली. ते बोलले, ” शंभू, कर्नाटकाच्या मोहिमेवेळेचा प्रसंग हा आमच्या जीवनातला कटू अध्याय होता. आपण जेव्हा छत्रपती व्हाल तेव्हाच आमचं खरं दुःख कळेल तुम्हांला. काही वेळा राज्याचं, समाज्याच हित लक्षात घेऊन आपल्या प्रिय व्यक्तीवर हेतूतः अन्याय करावा लागतो. पण तेवढा आमचा अधिकार नव्हता का शंभूबाळ आपल्यावर?”

“निदान रायगडावर तरी आम्हांला सुखानं राहून द्यायचं?”
‘रायगड’ हे नाव कानावर पडताच शिवाजीराजे स्तब्ध झाले. एक खोल सुस्कारा सोडत बोलले, “शंभूराजे, पहिल्यासारखा रायगड आता राहिलेला नव्हता. सामान्यांच्या भूका अगदी जुजबी असतात. कर्त्या स्त्रीपुरुष्याची तहान मात्र खूप मोठी असते. त्यातल्या त्यात राजतृष्णेसारखी जहरी तहान दुसरी नाही! राज्यतृष्णा शमविण्यासाठी प्रसंगी लेकरेही आपल्या बापाचा गळा घोटतात. माता वैरिणी होतात. अलीकडे अश्या राज्यतृष्णेला खूप जिभा फुटू लागल्या आहेत. त्यांचा सारासार विचार करूनच आम्ही तुम्हाला तेथे न ठेऊ देण्याचा निर्णय घेतला होता.
“आपली पुनर्भेट हि जगदंबेचीच कृपा म्हणायची! पण एक ध्यानात ठेवा, मायाममतेच्या लोभामध्ये न अडकता राजाला कठोर निर्णय घ्यावे लागतात. आज एक पिता म्हणून आम्ही तुम्हाला पोटाशी धरत आहोत, असा अर्थ नका काढू शंभूराजे!”
शंभूराजे शिवरायांकडे अचंबित नजरेने पाहू लागले. तेव्हा त्यांच्या खांद्यावर हात ठेवत शिवाजीराजे बोलले. ” आतापर्यंत औरंगजेब काबुल, कंदाहार अश्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये अडकून पडला होता. परंतु शंभू, गुप्तहेरांकडून मिळालेल्या बातम्या खूप चिंताजनक आहेत. वर्ष्या दोन वर्ष्यात औरंगजेब मोठी फौज घेऊन दक्षिणेत उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठीच त्याने बुऱ्हाणपूर, गुजरात आणि तिकडे मावळ्यातही दीडदोन लाखाच्या ताज्या फौजेची उभारणी केली आहे.
शंभूराजे थोरल्या महाराजांकडे पाहत दिलखुलासपणे हसले. त्यांच्याकडे अभिमानाने नजर फेकत बोलले, “आबासाहेब आता बोध झाला. गेल्या काही वर्ष्यापासून आपण फिरंग्याकडून दारुगोळा जास्ती का खरेदी करता आहात ते.”
“पोरा माझा बारुदखाना तूच आहेस! आज जगातल्या फक्त दोन तीन बलाढ्य सम्राटांमधला औरंगजेब एक आहे हे विसरून चालणार नाही. त्याच्याशी दख्खनच्या पठारावर मुकाबला फक्त आमचा छावा करू शकतो, हे सांगायला कोणा भडभुंज्या ज्योतिष्याची आम्हाला गरज नाही. लेकरा लढ! त्या कळिकाळाशी प्राणप्रणाणे लढा! इथल्या रानवानाला, पशुपाखरांना, गरीब लेकरांना मुक्ती दे!”
“आबासाहेब आपल्या आशीर्वादाने आम्ही इकडचा पर्वत तिकडे करू.” शिवाजीराजे मंदसे हसत बोलले, “बेटा , झुंजणे-झगडणे मनुष्याच्या हाती असते, पण नियतीच्या उलट्यासुलट्या चाली आणि भाग्यरेखा वक्र वळणं काही मनुष्याच्या मुठीत नसतात!उद्या कदाचित औरंग्याविरुद्धच्या तुझ्या त्या महासंग्रामात आम्ही असू किंवा नसू, मात्र आमचे आशीर्वाद आणि आमची पुण्याई तुझी जरूर पाठराखण करेल!”