संभाजीराजे: हिंदवी स्वराज्याचं पिवळेधमक खणखणतं नाणं

संभाजीराजे

संभाजीराजे: रायगडावर दसरा दिवाळीचा उल्हास पसरला होता. दोन-अडीच वर्षानंतर शिवाजीराजे आपल्या राजधानीत परतल्याचा आनंद होताच. त्यातच त्यांनी आणखी एक मंगलनिश्चय जाहीर केला. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव राजारामसाहेब आता दहा वर्ष्याचे झाले होते. त्यांच्या लग्नाचा बार उडवून दयायचे निश्चित झाले होते. मोरोपंत पेशवे हसत हसत फडावरील सहकाऱ्यांना बोलले, “थोरले महाराज नवी सोयरीक कोणाशी घडवून आणतात त्याबद्दल आम्हा सर्वांनाच खूप उत्सुकता होती. पण प्रतापरावांच्या जानकीची त्यांनी सून म्हणून निवड केली होती तेव्हा सर्वांनाच आनंद भरतं आलं.

राजरामांचे लग्नकार्य

महाराजांच्या घराचे कार्य म्हणून सारे सरदार कामाला लागले होते. राजे स्वतः वरपिते असल्यामुळे ते मधूनच बैठकीतून उठायचे, ती संधी साधून बाळाजी आवजींनी हळूच प्रश्न केला, “पंत खरंच पन्हाळाकडे संभाजीराजे आणि येसूबाईंना म्हणे लग्नाचं आवतणही पाठवलेलं नाही?”

“दुर्दैवाने हि गोष्ट खरी आहे बाळाजी!” बाळाजी आवजींना खूप वाईट वाटले ते बोलले, “अहो, निदान तोरणादारी आणि मरणादारी कोणा आप्तांना चुकवू नये असं म्हणतात! शंभूराजे तर राजारामराजांचे वडीलबंधू आहेत!” भावाच्या विवाहाचं साधं आमंत्रण शंभूराजेंना मिळू नये हा अन्यायच खरा!

“दुधामध्ये मिठाचा खडा आणि विवाहासारख्या मंगल सोहळ्यात अनाहूत पाहुणा हवाच कश्याला?” अण्णाजीपंत बोलले .

दुपार झाली. फड मोडला. पेशवे, मोरोपंत आणि इतर मंडळीही बैठकीतून बाहेर पडली. बैठकीतून खाजगीकडे निघणाऱ्या शिवाजीराजांना अण्णाजीपंत आडवेच आले. मुखावर नम्रताभाव आणत बोलले, “महाराज, आम्हां कारभारी वर्गाचा एक अर्ज आहे. रामदासांसारख्या युगपुरुषाने साहेबस्वारीस उगाच गौरवले नाही – महाराष्ट्र धर्म उरला काही तुम्हां कारणे! त्याच आमच्या राजश्रींकडून आम्ही थोडी न्यायाची, थोडी समानतेची वागणूकीची मागणी केली तर ती कशी वावगी ठरावी महाराज?”

“पंत, असे आडवळण कश्याला घेता? जे असेल ते स्पष्ट करावं.”, महाराज उतरले.

“कोणी नात्याचं असो, जिव्हाळ्याचं असो, स्वामींनी हिंदवी स्वराज्याच्या हितापुढं कोणाची कधीच पर्वा केली नाही. आपण प्रतापगडाच्या पायथ्याजवळ त्या अफजलखानाला फाडला, तेव्हा खंडोजी खोपड्याने डोंगरातून नेऊन त्या खानाच्या पोराला वाचवलं. खंडोजी आपले मोठे सेवक. परंतु स्वामींनी शेवटी त्या खोपड्याचा एक हात आणि एक पाय कलाम केलाच ना!”

“अहो सुरनीस, राजे घाईत आहेत. एवढं मोठं पुराण कशाला लावलंत?” बाळाजी आवजीं मधेच हस्तक्षेप करत बोलले.

अण्णाजींना बाळाजींच्या चोंबडेपणाचा विलक्षण राग आला आणि एक हात उंचावत न्यायाधीच्या थाटात अण्णाजी बोलले, “आम्हांला इतकंच सांगायचं होतं – स्वराज्यद्रोहासारख्या गुन्ह्यास शिवरायांकडे कस्पटाएवढीही क्षमा नसते!”

शिवरायांची चर्या कमालीची गोंधळली होती. तेव्हा बाळाजी सोडून बाकीचे सारे थरथर कापत उभे होते. असे विलक्षण धाडस अण्णाजीच करोत. अण्णाजींच्या हल्ल्याचा रोख महारांनी ओळखला होता. ते स्पष्ट शब्दात बोलले, “उगाच अवतीभवती घोडा नाचवत रिंगण काढू नका. तुमची जी शंभूराजांबद्दल तक्रार असेल ती सांगून मोकळे व्हा!”

अण्णाजी थोडेसे वरमले, “माफी असावी महाराज. पण मीच नाही तर धर्मशास्त्रसुद्धा हेच सांगत – न्यायाच्या तराजूपुढे सामान्य गुराखी आणि युवराज दोघेही सारखेच! नाही, म्हणजे थोरले युवराज तिकडे पन्हाळावर नजरकैदेत नव्हे तर सुखचैनीत वावरत आहेत. तेव्हा म्हटलं-“

“आम्ही त्यांना कधीच आणि कोणत्याच कैदेत ठेवलेलं नाही.” शिवाजीराजे स्पष्ट बोलले, “त्यांच्यावर आम्ही पन्हाळा, प्रभावली आणि दाभोळच्या सरसुभ्याची जबाबदारी सोपवली आहे.”

“तेच, तेच म्हणतो आम्ही स्वामी.” अण्णाजींनी आपल्या चर्येवरचा घाम पुसला आणि पुन्हा हात जोडत ते बोलले, “यापुढं आपल्या राज्यात राज्यद्रोहासारख्या गुन्ह्याला शिक्षेऐवजी बक्षीसच मिळतं, गुन्हेगार मोकाट सुटतात असा उगाच रयतेचा गैरसमज व्हायला नको.”

खाजगीकडे वळलेली पावले थबकली, एकदाचे काय ते होवो, असा निश्चय करून महाराज तिथेच बसून राहिले. ते कसनुसे हसत बोलले, “शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले, परंतु त्यांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल सजा मिळाली नाही हि फिर्याद घेऊन आमच्याकडे बाकी कोणी फिरकले नाही, पण अण्णाजीपंत आपण जरूर याला याची आम्हांला खात्रीच होती.”

शिवाजीराजे अचंबित झाले. हा असा नाजूक विषय अण्णाजी चारचौघात फडावर काढतील अशी महाराजांची अजिबात अपेक्षा नव्हती. किमान या प्रकरणाची पाळेमुळे अण्णाजी दत्तोजींशी संबंधित असल्यामुळे ते उघडपणे छेडणे योग्य नव्हते. आता कोणताही आडपडदा ठेवायला नको असे राजेंना वाटले. ते विषयाला सरळ हात घालत निश्चयी सुरत बोलले, “हे पहा अण्णाजीपंत, तुमच्या तरुण कन्येच्या अपघाती मृत्यूमुळे तुम्हांला किती दुःख झाले असेल याची आम्ही कल्पना करू शकतो. त्यामुळे खरंच या प्रकरणामध्ये शंभूराजे दोषी आहेत किंवा कसे याची चौकशी आम्ही सोयराबाई राणीसाहेबांवर सोपवली आहे. या प्रकरणी शंभूराजांकडून अत्याचार घडल्याचा एकही पुरावा आमच्यासमोर आलेला नाही.”

“राजे, आपण तर मुसलमान सुभेदाराच्या सुनेलाही साडीचोळीचा आहेर केला होता-” त्याच न्यायानं आम्ही तुम्हांला फर्मावतो अण्णाजीपंत, शंभूच्या बदवर्तनाचा आपण पुरावा पेश करा. ते गुन्हेगार आढळतील तर आम्ही आमच्या पुत्रास योग्य ती शिक्षा करू, जेरबंद करू.”

फडावर कमालीचा तणाव निर्माण झाला, राजांच्या स्वाभिमानी मनाची तार अण्णाजी दत्तोनी छेडली होती. राजारामांच्या विवाहाच्या निमित्ताने नव्हे तर अन्य कोणत्याही कारणाने शंभूराजे रायगडावर पुन्हा परतायला नकोत, अशीच अण्णाजींच्या मनाची धारणा होती. त्यामुळेच महाराजांच्या रोषाची पर्वा न करत ते बोलत होते.

शिवरायांनी मनातल्या संतापाचे विष गिळून टाकले. ते सामंजस्याच्या सुरत बोलले, “हे पहा मंडळी, शंभूराजे जसे आमचे पुत्र आहेत, तसेच तुमच्यापैकी अनेकजणांशी आमचे जन्माचे मैत्र जुळले आहे. आपणही या स्वराज्याच्या बांधणीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत, हे आम्ही नाही विसरू शकत.”

“महाराज, ह्या साऱ्या प्रकारचा आम्ही सोयीस्कर अर्थ असा काढायचा का – कि, असं काही घडलंच नव्हतं? शंभूराजे मोगलांना सुद्धा मिळाले नव्हते. ते तिकडे गेलेच नव्हते. श्रुंगारपुराच्या वाड्यात फक्त बसून होते.

“अण्णाजीपंत लक्षात ठेवा. शंभूराजे तर दिवसाढवळ्या मोगलांना जाऊन उघडपणे मिळाले होते. आता प्रश्न इतकाच उरतो की, मोगलांकडे जाऊन त्यांनी स्वराज्याचे काय नुकसान केले? मोरोपंत कुठे आहेत ते? बोलवा त्यांना.”

“राजे, शंभूबाळ हूड स्वभावाचे आहेत. कोणाला ते उर्मटही वाटतात. परंतु त्यांचं हृदय मात्रनिर्मळ आहे, हे आम्ही शपथेवर सांगू.” अण्णाजी आणि सोयराबाईंच्या वक्र नजरेची पर्वा न करता बाळाजीपंत चिटणीस बोलले.

संभाजीराजे – स्वराज्याचं खणखणतं नाणं

महाराजांच्या हुकुमावरून एक गुप्त लखोटा घेऊन मोरोपंत पेशवे फडावर पोचले. त्यांनी लखोट्याची चांदणी दांडी महाराजच्या हाती सुपूर्त केली. तिचे रेशमी बंध उघडत शिवाजीराजे बोलले, “हे पहा, आम्ही कर्नाटकात गेलो होतो तेव्हा आम्ही जातानाच शंभूराजांच्या अवती भवती गुप्त जासूदांची पेरणी केली होती. शंभू आणि दिलेरखान यांच्यातला पत्रव्यवहार सुरु होता; याची कल्पना आमच्या जासूदांना आली होती. अनेकदा ते युवराजचे पत्रे मध्ये हस्तगत करत आणि त्याची नक्कल बनवून आम्हाकडे कर्नाटकला पाठवत. पुढे आम्ही पन्हाळावर गेलो आणि शंभू सज्जनगडावर गेले. त्यामुळे आमच्या गुप्त जाळ्याचा धागा कुठेतरी खंडित झाला. म्हणूनच हा पुढचा अनर्थ ओढवला. असो. मात्र शंभूराजांनी शृंगारपुराहून दिलेरखानाला पाठवलेल्या एक पत्राची हि नकल पहा. काय लिहितात आमचे चिरंजीव ह्या खलित्यामध्ये?–आमचे पिताश्री आमच्यावर भरवसा ठेवून दूरदेशी गेले असताना, त्यांच्याशी दगाफटका करणं आणि तुम्हाला येऊन मिळणं, हे जातीधर्माच्या शोभणारं नाही!–गड्यानो, दिसतो काही फरक इथे तुम्हांला? आपल्या पाठच्या सख्ख्या भावाची आणि पोटच्या पोरांचीही सत्तेसाठी बकरीसारखी मुंडी छाटणारे ते मोगलांचे शहजादे कुठे आणि आपल्या पित्याच्या गैरहजरीत राज्याचे नुकसान करायला घाबरणारा हा बाजिन्दा राजकुमार कुठे? हाच, हाच फरक असतो मोगलांच्या शाहजाद्यांमध्ये आणि मराठ्यांच्या युवराजांमध्ये!”

महाराजांची मुद्रा खूपच व्यथित दिसू लागली, ते सहकाऱ्यांना बोलले, “दिलेरला जाऊन मिळण्याचा संभाजीराजांचा गुन्हा म्हणजे एक प्रकारचा गुन्हा होता आणि स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पनांचा तो उच्छाद होता यात शंकाच नाही! मात्र त्याचवेळी आपण हे ध्यानात घ्यावं, मराठी राज्याच्या नरडीला नख लावावं आणि आईभवानीचा कपाळमोक्ष व्हावा अशा गद्दाराच्या कल्पनेनं खरंच शंभूला पछाडलं असत तर? सांगा, सांगा. आमच्या गैरहजरीत गुपचूप रायगडाच्या माथ्यावर जाऊन बंडाची तुतारी फुंकली असती तर? ती धक्कादायक बातमी कळल्यावर धावत्या घोड्यावरून इथे पोचायलाही आम्हांला किमान चार दिवस लागले असते. पण दरम्यान कोण रामायण घडले असतं!”

महाराजांच्या वक्तव्यावर बाकीची प्रधानमंडळी चिडीचूप झाली होती. महाराजांनी अण्णाजीवर नजर रोखत मोरोपंतांना प्रश्न केला, “काय पंत, अशी नौबत उद्भवली असती तर आपण काय केलं असतं?”

“माफ करा स्वामी. असा दुर्दैवी प्रसंग एकतर ओढवलाच नसता. मात्र तशी आणीबाणी आलीच असती तर आम्ही सर्वांनी मिळून शत्रूंशी झुंज दिली असती”

महाराज मोठ्याने हसत बोलले, “तुमच्यापैकी तेव्हा रायगडावर कोणीही मौजूद नव्हतं. तुम्ही सारेजण कोणत्या ना कोणत्या कामगिरीसाठी बाहेर गेला होतात. ठीक आहे पंत, आपण हेही मान्य करू. युवराजांच्या अशा आततायीपणामुळे आपलं राज्यं बुडालं नसतं कदाचित, मात्र वैऱ्यांच्या नजरेत ते कमालीचे पंगू झाले असते, त्याचे काय?”

आता सदरेवर कोणालाही काही बोलवत नव्हते. महाराजांची चर्या, त्यांचा कातर सूर आज सारेच काही वेगळेच भासत होते, थोरले महाराज उठले प्रधानमंडळीही जायला निघाली. तेव्हा महाराजांची पावले पुन्हा थबकली. सर्वांकडे नजर टाकत ते कातर आवाजात बोलले,

शंभूराजांच्या जन्मावेळी आम्ही प्रतापगडाच्या लढाईत मश्गुल होतो. तेव्हा शंभूराजे जन्माला आले. तो मांसाचा इवलासा गोळा सईबाईंनी जिजाऊसाहेबांच्या हाती सुपूर्त करून सईबाई देवाघरी गेल्या. शंभूला आम्ही छातीशी प्रथम लपेटलं होतं. तेव्हा त्यांनी आमचा अंगठा घट्ट धरून ठेवला होता. तेव्हापासून आमच्यातल्या राजाने आणि राज्यवस्त्रांच्या आत लपलेल्या त्याच्या पित्याने त्याला खूप जवळून निखारलेलंही आहे. सोयराबाईराणीसाहेब, अण्णाजीपंत तुम्हां कोणाला आमचे शंभू शीघ्रकोपी वाटतील, कोणाला उद्धटभासतील, पण एक मुद्दाम लक्षात ठेवा, आमच्या जिजाऊसाहेब आम्हांला नेहमी आठवण करून द्यायच्या – शिवबा, ह्या शंभूच्या वरवरच्या धुमुसळेपणावर जाऊ नकोस. हे पिवळेधमक खणखणतं नाणं आहे! पुढे मागे तुझ्या हिंदवी स्वराज्यावर प्रसंग ओढवला तर तुझा हा वेडा पोर प्रसंगी प्राण गमावेल, पण सत्व सांभाळेल!”

संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.

खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.

संदर्भ: संभाजीविश्वास पाटील’ यांचा पुस्तकातून घेतलेला मजकूर.

अशाच अनेक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा – Facebook | Instagram | YouTube | Twitter | Telegram वर

You Might Also Like

One Reply to “संभाजीराजे: हिंदवी स्वराज्याचं पिवळेधमक खणखणतं नाणं”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *