अजगराच्या विळख्यातून सुटका…
अजगराच्या विळख्यातून सुटका…. दिलेरखानाची आता खऱ्या अर्थी झोप उडाली होती. एवढ्या मोठ्या फौजेच्या समोर मराठ्यांच्या युवराजाने आपल्या अंगावर तलवारीनिशी हमला चढवावा, त्याच्या त्या धाडसाचेच खान हादरून गेला होता. इतके दिवस ” शिवाच्या खतरनाक पोराला जल्दी कैद करा.” त्याच्या मुसक्या बांधून त्याला काहीही कोशिश करून दिल्लीकडं रवाना करा.” अशी पत्रावर पत्रे औरंगजेब का लिहीत होता, याचा उलगडा आता दिलेरखानाला होऊ लागला.
काही महिन्यांपूर्वीच विजापूरकरांनी चाकरी सोडून मुनासीब खान आपल्या पुतण्या बालेखानसह दिलेरखानाला येऊन मिळाला होता. दिलेरखानाच्या सांगण्यावरून मुनासीब खानचाचाने संभाजी राजांना स्वराज्यात परत घेऊन जाण्यासाठी आलेल्या २०० मराठ्यांचं घोडं त्याने काढून घेतलं व त्यांना वेठबिगारी मजुरांत दाखल करून घेतलं.
“खानसाब, आपल्या हुकुमाची तालिम झाली. लेकिन खानसाब हि आग अजून किती दिवस सांभाळायची?”
” मुनासीबचाचा, उद्या सकाळपर्यंत औरंगाबादचं पाच हजरांच पथक इथं पोचेल. सोबत आपले पाच हजार देऊ आणि हा आगीचा लोळ देऊ पाठवून औरंगजेबाकडे.
दुसऱ्या दिवशी दुपारी पथके पुढे चालली होती. कालच्या भांडणाचा राग त्यांच्या डोक्यातून जावा, किमान त्यांना जेरबंद करायला पातशाहाच्या फौजेतून बाहेर पडलेले घोडदळ इथे येईपर्यंत वेळ मारून न्यावी, म्हणूनच दिलेर आज त्यांच्याशी लाडीगोडी करत होता. त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
समोरची एक टेकडी लष्कराने ओलांडली. शंभूराजांची नजर बाजूच्या दरीकडे गेली. तिथे एक मोठे तळे होते. तळ्याच्या काठी एक जुने दगडी शिवमंदिर दिसले, तसे युवराजांनी हत्ती रोखायला सांगितले, ते हसत दिलेरखानाला म्हणाले, “खानसाहेब, बरेच दिवस झाले देवाचं दर्शन घेतलं नाही. इथं थोडं थांबून स्नान करून देवदर्शन करावं असं वाटतं.”
दिलेरखान मनातून सुखावला होता. आपल्या कब्ज्यात हि संभाजीची शेवटची अंघोळ असणार हे त्याला ठाऊक होते. म्हणून त्याने संभाजी राजांना अडवणूक न करता बोलला, ” युवराज, अशी बिनति नका करू, घ्या तुमची पूजा उरकून.” संभाजी राजे आपली खाजगी सेवक घेऊन तळ्याकडे गेले. त्यांनी आपल्या सेवकांनाही कपडे काठावर ठेऊन अंघोळीसाठी तळ्यात उतरायला भाग पाडले . त्यांच्या सोबतची मुनासीबची पथके दुपारचा खाना घेत होती, परंतु त्यांनी खबरदारी म्हणून काही पथके तळ्याच्या काठी उभे केली होती.
त्याच तळ्याच्या काठी पाच गोसावी स्नान करत होते. त्यांचे मंत्रपठण चालू होते. मधेच ते “जय शंभो, जय शंभो” असा मोठ्याने उच्चार करत होते. शंभूराजांचे तिकडे फारसे लक्ष गेले नाही, पुन्हा कानावर दबक्या सुरामध्ये आवाज आले, ‘ शंभो शिवाका शंभो!’
शंभूराजांचे तिकडे लक्ष गेले त्यांनी डोळे रोखून पहिले. तशी त्यांच्या अंगामधून विजेची लहर चमकून गेली. त्या पाच गोसाव्यांमध्ये एकजण जोत्याजी होता आणि दुसरा रायाप्पा.
राजांचे डोळे चौफेर फिरले. रखवालदारांना संशय येऊ नये अश्या बेताने ते पुढे पोहण्याचा बहाणा करत पुढे सरकले. गोसाव्यांपुढे शंभूराजे पोचताच मात्रपठणाचा आव आणत जोत्याजीने हळू आवाजात सांगितले, “मंदिराच्या मागं आपली फक्त पाच घोडी आहेत. टेकडीच्या मागं जंगलात फक्त पन्नास शृंगारपुरी घोडेस्वार आहेत. एवढ्याच बळावर धाडस करायला पाहिजे राजे”.
संभा निकाल गया!
शंभूराजांनी पाण्यातून सूर्यनमस्कार घातला. ते पाण्यामध्ये पुनःपुन्हा डुबक्या मारू लागले. पहाऱ्यावरचे स्वारशिपाई त्यांच्याकडे कौतुकाने पाहत होते. जास्तीत जास्त वेळ राजे श्वास रोखून पाण्यात थांबण्याचा जणू विक्रमच करत होते. मध्ये थोडा वेळ गेला. पण बराच वेळ शंभूराजे पाण्याबाहेर येईनात, तसे पहाऱ्यावरचे शिपाई बावरले. तितक्यात शेजारच्या देवळामागून बोंब ऐकू आली, “संभा निकाल गया! संभा भाग गया!”

दिलेरखानाच्या तळावर गडबड उडाली. दिलेर संतापाने थयथय नाचू लागला. परंतु तोवर हुकुमाची वाट न बघता बालेखान आपल्या पाच हजाराच्या फौजेनिशी जंगलामध्ये घुसला. दिलेरखान आगपाखड करू लागला. इतक्यात मुनासीबखान घोडा फेकत दिलेरखानाच्या गोटापुढे आला. आणि म्हणाला, ” संभासारखा बेवफूक लोंडा कोणी बघितला नसेल. हुजूर, मी पुरी जाणकारी घेतलीय. मोजून पाच गोसावी त्याच्यासोबत आहेत. बालेखान पाच हजारांची फौज घेऊन गेलाय त्याच्या मागे. भागून तो बेवकूफ संभा किती भागणार!” पुरं जंगल छान मारतो. अवघ्या तासा दोन तासात त्याची बोटी बोटी करून रुमालात बांधून वापस घेऊन येतो.
मुनासीबखानने घोड्याला टाच मारली तोवर दिलेरखान ओरडला, “ठहरो मुनासीबखान, संभाला जिंदाच पकडून आणा, त्याला मारू नका. नाही तर ती लाश संभाचीच आहे हे शहेनशहाला पटणार नाही. नौबत ओढवेल!”
मुनासीबखान आपल्या सोबतची माणसे घेऊन जंगलात घुसला. परंतु शंभूराजे आणि त्याचे सहकारी खूप वेगाने पुढे गेले होते. त्याचा पाठलाग करत बालेखान खूप पुढे निघून गेल्याचे दिसत होते. त्यामुळे मुनासीबखान बावरला. आपल्या घोड्याला पुनःपुन्हा टाच मारत तो सुसाटासारखा पुढे निघाला होता.
एका टेकडावरून मुनासीबखानने खाली दरीकडे पहिले. तिथे खाली एक मोठा ओढा होता. ओढ्याकाठी झाडाच्या बुंध्याला शंभुराजांना बांधले होते. शंभूराजांचे सर्वांग रक्ताने माखले होते. चर्याही रक्ताच्या ओरखड्यांनी भरून गेलेली. ह्या मर्दाने हातघाईच्या जंगात किमान साठसत्तरजण सहज लोळवले असतील अशा रक्तखुणा आणि ओरखडे त्यांच्या सर्वांगावर दिसत होते. बालेखान हातातली तलवार उंचावत रागाने शंभूराजांच्या पुढे नाचत होता.
ते दृश्य पाहून मुनासीबखानचे काळीज हलले. तो आपल्या पुतण्याकडे बघून ओरडला, “बेटे बालेखान ठहरो! आगे मत बढो. खुदाके वास्ते ठहरो बेटे” असे म्हणत त्याने घोड्यावरून खाली उडी घेतली. एकदाचा मुनासीबखान तो कडा उतरून फक्त काही अंतरावर गेला. तितक्यात त्याने पुढे पहिले, बालेखान शंभुराजांना गुद्दे मारत होता . शिव्या देत होता. त्याने रागाच्या कैफात शंभूराजांची दाढी पकडून पुढे ओढली. तसे शंभूराजे चिडले. बालेखानच्या तोंडावर थुंकले. त्याबरोबर बालेखानाला राग आवरला नाही. त्याने झटकन म्यानातून तलवार काढली. दोन्ही हातांमध्ये धरून त्या तलवारीचे पाते शंभूराजांच्या डोक्यात तो मारणार, तोच पाठीमागून गर्जना अली, “बालेखान बेटे—” पाठोपाठ बाणाच्या वेगाने भाला आला आणि त्याचे पाते कचकन बालेखानाच्या पाठीत घुसले. आणि बालेखान खाली कोसळला.
स्वतः शंभूराजे, त्यांना वेढा घातलेले हजारो मुस्लीम शिपाई आणि भालाफेक करणारा मुनासीबखान सारेच अवाक झाले. दुसऱ्या क्षणी मुनासीबने बालेखानकडे झेप घेतली त्याला आपल्या पोटाशी कवटाळले. त्याला पाणी पाजण्याचा वृथा प्रयत्न केला. परंतु बालेखान केव्हाच संपला होता. मुनासीब त्याच्यासाठी धाय मोकलून रडत होता.
मुनासीबखानाचे अनेक जाणते साथीदार, फौजी पुढे आले. ते आपल्या धान्यावर खूप संतापले. त्यातल्या एकाने रागाने विचारले, “चाचा, एका जहन्नमी काफरांच्या बचावासाठी आपण हे काय केलंत! स्वतःच्या पुतण्याला मारलं?”
“क्यू बेटे? खाली एक मुर्दा बघून तुम्हाला इतकं वाईट वाटतं?” सहकाऱ्यांवर जळजळीत कटाक्ष टाकीत मुनासीब गरजला, “अथणी आणि तिकोट्याला त्या बदमाष दिलेरखानाने भर चौकामध्ये कोणाची अब्रू घेतली? अनेक औरते, माँ-बेहने नंगी करून त्यांना झाडांना टांगून त्यांची अब्रू कोणी घेतली? भूल गये आप? त्या बेसहारा स्त्रियांत हिंदू कमी आणि मुसलमान माँ-बेहने जास्त होत्या. पण ते दृश्य बघून तुमच्यापैकी कोणाची तलवार म्यानातून का बाहेर आली नाही?”
“याने?” एका मुसलमान शिपायाने विचारले.
तो अत्याचार बघून ज्याच्या अंगातले रक्त गरम झाले, त्या अत्याचारी दिलेरखानाच्या अंगावर धावून जो एकमात्र माणूस गेला, तो शिवाचा छावा होता, आपमेंसे कोई नहीं था! तब कहाँ चुप बैठी थी ये मर्दानगी?
बाकीचे सारे शांत झाले. चक्रावून गेले. एकजण गोंधळून विचारू लागला, “आखिर आप कहना क्या चाहते हो चाचा?”
“बस इतानाही. मोठी चाहत होती आम्हां सर्वांची! त्यासाठीच सहा महिन्यामागे आपली विजापूरची चाकरी सोडून आपण सारे दिलेरखानाला जाऊन मिळालो. तो आपल्या जिंदगीतला सर्वात बडा गुन्हा होता. आज औरंगजेबाचा एक सरदार दक्षिणेत येऊन आपल्या इस्लामी माँ-बेहनांवर इतके अत्याचार करू लागला, तर काळ औरंगजेब आल्यावर काय होईल?”
“बिलकुल चाचा!” समोरून काही आवाज आले.
“मी खुदाची कसम घेऊन सांगतो, आज शियापंथी दख्खनी मुसलमानांसाठी दुनियेतील सर्वात बडा काफर औरंगजेब पातशहा आहे. बच्चो, हा दिल्लीवाला सैतान मराठ्यांचं राज्यं नेस्तनाबूत करण्यात कामयाब झाला, तर आपल्या विजापूरच्या आणि गोवळकोंड्याच्या सल्तनती एक दिवसही जिवंत ठेवणार नाही तो. हमें कैसी भूल पड़ी? गेल्या वर्षी विजापूर बचावासाठी दहा हजार बैलांच्या पाठीवरून धान्य पाठवले होते ते शिवाजीने! औरंगजेबाने नाही! म्हणूनच सांगतो, औरंगजेबाच्या अत्याचारातून आम्हां दख्खनींना मुक्ती मिळण्यासाठी शिवाजीचं राज्य टिकलं पाहिजे “
मुनासीबखानाने आपल्या कमरेला खोचलेली कट्यार बाहेर काढली, बोलता बोलताच त्याने शंभुराजांना बांधलेले दोर कचाकच तोडून टाकले. समोरच्या काही सहकाऱ्यांना जवळ बोलावले. शंभुराजांना घेऊन जाण्यासाठी आलेल्या पंचवीसतीस साथीदारांना ताजी घोडी दिली. शंभूराजांच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवत तो आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, ” त्या शिवावर एहसान करण्यासाठी नव्हे, तर आम्हा दख्खनीच्या हिफाजतीसाठी शिवाचा हा पोर शाबूत राहिला पाहिजे. जा बेटे! भाग, बेशक निकल जा”
शंभूराजांनी रक्ताळलेल्या अंगरख्यानेच मुनासीबखानला मिठी मारली. सर्वांचा निरोप घेतला.
संभाजी चतुराईने कसा पळून गेला, दिलेरखानाला नेमके काय सांगायचे याचा विचार करत ती विजापुरी फौज मगर वळली.