कलशाभिषेक: अशुभ गोष्टींसाठी केलेली शांती

Sambhaji Maharaj

कलशाभिषेक – आभाळातून वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र ढगांप्रमाणे दिवस झरझर जात होते. शृंगारपूरच्या नित्यपाठामध्ये तास विशेष काही फरक पडत नव्हता.परंतु एके दिवशी दुपारी बाळाजी आवाजी चिटणीसांची पालखी वाड्याजवळ येऊन पोहोचली. सडपातळ बांध्याचे, कातळ, गौर वर्णाचे, साठी ओलांडलेले बाळाजी पालखीतून खाली उतरले. विशीतल्या उत्साही पोराच्या झपाझप चालीने ते राजवाड्याच्या सलग पंचवीस पायऱ्या एका दमात चालून वर आले. त्यांच्या आगमनाने शंभूराजे व येसूबाई आश्चर्यचकित झाल्या.शंभूराजेंनी हसत विचारले,”बाळाजीकाका,अगदी अनमानधपक्या आलात?”

शंभूराजे गडावर आता जीव लागत नाही.महाजराजांना कर्नाटकात जाऊन बरेच मास लोटले.म्हंटल युवराजचा तरी दिसा दोन डासांचा सहवास लाभेल.”

बाळाजी आवजींना शंभूराजेंविषयी पहिल्यापासून खूप ओढ होती. बिनामातेचे लेकरू, त्यात थोरले महाराज हि सातत्याने आपल्या कामकाजात गढलेले असायचे. अशा वेळी शंभूराजेंची हित पाहणारी प्रथम राजगडावर आणि नंतर रायगडावर जी मोजकी मंडळी होती, त्यामध्ये बाळाजी आवजींचा समावेश होता. आपला शांत स्वभाव ढळू न देणारे, दरबारात शंभूराजांचे हित जपणारे, मुत्सद्दी बाळाजीपंत चिटणीस फार दिवसांनी भेटत होते. त्यामुळेच युवराज आणि युवराज्ञी दोघेही सुखावुन गेले होते. बऱ्याच दिवसांनी बाळाजी पंतांनी शंभूराजांसमवेत भोजन घेतले. त्या सुग्रास जेवणाने त्यांची मनकाळी फुलली. मात्र भोजन घेता घेता अन्नात गारेचा तुकडा अडकवा तसे झाले. बाळाजी चिडक्या स्वरात बोलले, “आम्हाला वाटलं नव्हतं तुम्हाला राजा व्हायची एवढी घाई लागली होती म्हणून!”

“काय बोलता आहात आपण काका? आमचे आबासाहेब गादी वर असताना राज्य पदासाठी गुढग्याला बाशिंग आम्हाला काय कारण? तसं करायला आम्ही काय कुठल्या सुलतानाचे वा मोगलांचे दुष्ट शहजादे वाटलो कि काय तुम्हांला?”

“तसं नसेल तर तो महाभयंकर अभिषेक कसा केलात ?”

“कोणता?”

“तो कलशाभिषेक कि काय तो! “डोळे बारीक करत बाळाजींनी विचारले

“हो. केला आम्ही.” शंभूराजांनी स्पष्ट कबुली दिली.

“अरेरे ! काय केलंत हे शंभूराजे?” बालाजी आवाजी हळहळले . त्यांची चर्या उतरली.

“काय करणार बालाजी काका? अहो, रपेट मारत असतानाच तगडा घोडा अचानक अडखळून मृत्यू कसा पावतो? आमच्या महालाच्या मागेपुढे अनेकदा हळदीकुंकूवात भिजलेले ते लिंबू, सुया टोचलेले बिबे, काळ्या मंतरलेल्या बाहुल्या अश्या अशुभ वस्तूंचा नित्य सदा पडावा ?”

“पण म्हणून कलशाभिषेक?” बाळाजी आवजींनी डोळे उडवले.

“दुसरं तरी काई करणार काका? खाजगीकडे, दरबारामध्ये, पागेत, कुठं कुठं शांती नाही. मेव्हणा गणोजी नाखूष, जगायची लाज वाटावी अशी दरबारी दुष्टांनी चालवलेली आमची बदनामी, बदफैलीचे घाणेरडे आरोप, उठसूट आम्हांला पाण्यात पाहणारे अष्टप्रधान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जगासाठी डोंगरासारखा आधार वाटणारे पण आम्हापासून रोज दुरावत जाणारे आमचे आबासाहेब – हि सारी वखवख अनुभवली आणि म्हटलं एकदाची शांत करून टाकावी”.

“शांती? हि अशी शांती?” बाळाजी आवजींची चर्या लज्जित झाली. त्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या विलक्षण गतीने गोल गोल फिरू लागल्या. त्यांचा कंठ दाटला. ते कळवळून ओरडले, “म्हणजे बाळराजे, ज्या शिवप्रभूंनी हा महाराष्ट्र घडवला, त्यांचीच कामयची शांती करायला निघावे तुम्ही?”

बाळाजी पंतांनी कलशाभिषेकाचा जो अर्थ ध्यानात घेतला होता, त्याच्या नुसत्या कल्पनेने शंभूराजांच्या अंगातले वारे गेल्यासारखे झाले. कोणीतरी वर्क पात्याची कट्यारचं जणू काळजात घुसवली होती. ते मंचकावरून उठून खाली जाजमावर बसत अत्यंत घाबरलेल्या स्थिती मध्ये बाळाजींना बोलले, “किती भयंकर बोलता आहात आपण हे काका?”

कलशाभिषेकाचा खरा अर्थ

“बाळराजे, कलशाभिषेकाचा दुसरा अर्थ तरी कोणता.” बाळाजीपंत हुंदके फुटल्यासारखे बोलले, “एक राजा मेल्याशिवाय दुसरा राजा गादीवर येऊ शकत नाही आणि ज्याला सत्येची घाई झाली आहे, त्याने कलशासारखे बदमाश मांत्रिक गोळा करायचे असतात आणि तंत्रमंत्राच्या अघोरी विद्येच्या बळावर हयात राजाचा नाश करायचा असतो. दिवंगत राजाच्या श्राद्धादिवशीच नव्या राजाने मंचकारोहण केले कि, ह्या कलशाभिषेकाची पूर्ण समाप्ती होते, असं शास्त्री पंडित सांगतात.

शंभूराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रूधारा वाहू लागल्या. त्यांनी त्वरेनं विचारले, “कलशाभिषेकाच्या विधीचा हा भयंकर अर्थ तुम्हाला कोणी सांगितला?”

“अहो आता कोण बोलायचे राहिले आहे? तिकडे रायगडापासून पन्हाळगडापर्यंत बभ्रा पसरला आहे. आपल्या या भयंकर कृत्याची बातमी सांगणारे खलितेही राजांकडे काही मंडळींनी कर्नाटकात पाठवले आहेत. अण्णाजी दत्तो, राहुजी सोमनाथचा शिष्य वर्ग, त्यांचे पुतणे, भाचे, खुद्द आपल्या सावत्र माता सोयराबाई राणीसाहेब, थोरांपासून पोरांपर्यंत आपल्या ह्या करणीबद्दल जो तो बोलतो आहे!” बाळाजी आवजींनी उपरण्याने आपली मुद्रा पुसली. ते बोलले, “ह्या भयंकर गोष्टी तिथे ऐकताना काळजाला छिद्रे पडू लागली म्हणूनच आलो इकडे.”

बाळाजी पंतांच्या तोंडून त्या एक एक धक्कादायक गोष्टी ऐकताना युवराज आणि युवराज्ञी दोघेही सर्द झाले होते. आपल्या हुंद्क्याच्या उमाळा दाबण्याचा प्रयत्न करत शंभूराजे बोलले, “ज्या नीच महाभागांनी कुजक्या मेंदूतून अशी विषारी अनुमान बाहेर पडतात, त्यांच्या तोंडात राख भरायला उद्या गाढवंसुद्धा पापकर्म मानतील!”

अस्वस्थ जखमी मावळ्यांसारखे शंभूराजे खाली कोसळले. त्यांचा कातर सूर आणि खोल वेदनेची जात बाळाजी आवजींसारख्या मुरब्बी राजकारण्याने तात्काळ ओळखली. त्यांनी आणि येसूबाईंनी शंभुराजांना आधार देऊन मंचकावर बसवले. पाण्याचे पात्र त्यांच्या ओठी लावले. तापवलेली सळई कोणीतरी काळजावर ठेवावी तशा वेदनेने शंभूराजे कळवळले, “बाळाजीकाका, अहो ज्या जिजाऊंनी आमच्या मातोश्रीच्या मागे आम्हांला सानाचे थोर केले, त्या जिजाऊंच्या बाळाचा काळ व्हायची भयंकर स्वप्न हा संभाजी बघत असेल, अशी कल्पना तुम्ही तरी कशी करू शकता?”

कलशाभिषेकाचा जो अर्थ बाळाजी आवजींनी सांगितला होता, त्या विचाराने शंभूराजांच्या जिव्हारी घाव बसला होता. शंभूराजांनी केलेला कलशाभिषेक ही फक्त त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या अशुभ गोष्टींसाठी केलेली शांती होती.

संभाजी महाराज यांचा इतिहास सर्वाना समजण्यासाठी हि पोस्ट नक्की शेअर करा.

खालील दिलेल्या कमेंट रकान्यात आपले मत नक्की कळवा.

You Might Also Like

One Reply to “कलशाभिषेक: अशुभ गोष्टींसाठी केलेली शांती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *